सावधान, होळी खेळताय ? जपून… 5 हजारांचा दंड किंवा 1 आठवडा तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते
त्यामुळं मुंबईकरांनो, होळी साजरी करताना महापालिकेच्या नियमांचं पालन करा असं आवाहन महापालिकेनं केलंय
होळीला अवघे दोन दिवस उरले आहेत. रंगांची उधळण आणि आनंदाच्या या सणाची लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वचजण आतुरतेने वाट पाहत असतात. हिंदू धर्मात सण उत्सवाला महत्त्व आहे. होलिका या राक्षसाच्या दहनाचा उत्सव साजरा करण्यासाठी आग लावली जाते. हा विधी वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे असं मानलं जातं. होलिका दहनाच्या तयारीत गुंतलेल्या लोकांना महापालिकेच्यावतीनं विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. होलिका दहनसाठी कोणी बेकायदेशीर वृक्षतोड केल्यास 5 हजारांचा दंड किंवा 1आठवडा तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. यासंदर्भात महापालिका (BMC) प्रशासनानं आदेश जारी केलाय. त्यामुळं मुंबईकरांनो, होळी साजरी करताना महापालिकेच्या नियमांचं पालन करा असं आवाहन महापालिकेनं केलंय.
पर्यावरणाच्या दृष्टीने झाडांच्या संवर्धनआवश्यक आहे. होळीच्या सणा निमित्त अवैध वृक्षतोड केली जाते. अशी वृक्षतोड पर्यावरणाला हाणीकारक ठरु शकते. होळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणत्याही प्रकाराची वृक्षतोड करू नये. अनधिकृत वृक्षतोड झाल्याचे आढळून आल्यास याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात येणार आहे.अनधिकृत वृक्षतोड झाल्याचे आढळून आल्यास याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात येईल, असा इशाराही पालिका प्रशासनाने दिला आहे. तसेच होळीच्या कालावधीत वृक्षतोड होत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी महानगरपालिका अधिकाऱ्यांना व स्थानिक पोलिस ठाण्यास कळवावे किंवा महानगरपालिकेच्या १९१६ या मदत क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही पालिका प्रशासनाने केले आहे.
पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, ‘महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण व संवर्धन अधिनियम, 1975 च्या कलम 21 अन्वये, वृक्ष प्राधिकरणाच्या पूर्व परवानगीशिवाय कोणतंही झाड तोडण्यास किंवा तोडण्यास कारणीभूत होणं हा अपराध आहे. अनधिकृत वृक्षतोडीच्या प्रत्येक गुन्ह्यासाठी संबंधित व्यक्तिला कमीत कमी रुपये 1 हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्याची तरतूद आहे. आपल्या परिसरात आपल्या आजूबाजूला असलेली निसर्ग संपदांचं जतन करून जोपासणं हे आपलं कर्तव्य आहे. ही झाडेच तुम्हाला आम्हाला आणि संपूर्ण मुंबईला प्राणवायू देण्याचं काम करतात. त्यांचं संरक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळं सर्व मुंबईकरांनी महानगरपालिकेला आणि कर्मचाऱ्यांना सहकार्य करावं, असं आवाहन उद्यान अधीक्षक परदेशी यांनी केलंय.