महिलेच्या गळ्याला चाकू लावून सोन्याचे दागिने, रोख रक्कम लुटली.. सहा तासात रिक्षाचालकाला अटक
शंकर जाधव
शंकर जाधव
आजदेगावातून कल्याणमधील ए.पी.एम.सी. मार्केटला जाण्यासाठी रिक्षात बसलेल्या महिलेला निर्जनस्थळी नेऊन तिच्या गळ्याला चाकू लावून सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल, पर्स असा एकूण ३६ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून पळ काढला. ही घटना 22 तारखेला सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर सहा तासाच्या आत चोरट्याला रामनगर पोलिसांनी अटक केली. चोरी करताना तरुणाबरोबर आणखी दोघा अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनिल अशोक खिल्लारे ( २५, रा. राजीव गांधी नगर, शेलार चौक, कल्याण रोड, डोंबिवली ) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. अनिल हा रिक्षाचालक असून त्याच्या बरोबर चोरीच्या गुन्हातील दोघे अल्पवयीन मुलांवर चोरी, घरफोडी, जबरी चोरी, दरोडयाची तयारी असे एकूण चार गुन्हे डोंबिवली व वाशिंद पोलीस ठाण्यात दाखल आहेत. या गुन्हासाठी वापरलेली रिक्षा आणि चाकू पोलिसांनी हस्तगत केला आहे. फिर्यादी महिलेला घरडा सर्कल येथून MH-05-DQ-0367 क्रमांकाच्या रिक्षात बसल्या होत्या.रिक्षाचालक व रिक्षात बसलेल्या दोघांनी संगतमत करून महिलेला काही अंतरावर कल्याण येथील बी.एस.यु. बिल्डींग जवळील मैदान, न्यु गोविंदवाडी येथे निर्जनस्थळी रिक्षा थांबवली.रिक्षाचालक अनिलने महिलेच्या गळ्याला चाकू लावत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. रिक्षातील दोघांनी महिलेकडील रोख रक्कम, मोबाईल, पर्स असा एकूण ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल हिसकावून पळ काढला.महिलेने पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीवरून चोरट्याविरोधात भादंवि क. ३९७, ३९४, ५०६, ३४ सह भारतीय हत्यार कायदा क.४,२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करून सहा तासाच्या आत रिक्षाचालकाला अटक केली तर दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले.सदरची कामगिरी पोलीस उप आयुक्त सचिन गुंजाळ, सहायक पोलीस आयुक्त ( डोंबिवली विभाग ) सुनील कुराडे, रामनगर पोलीस ठाण्याचे वपोनि सुनिल जवादवाड यांचे मार्गदर्शनाखाली डोंबीवली पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि बळवंत भराडे, पोहवा सुनिल भणगे, पोहवा विशाल वाघ, पोहवा सचिन भालेराव,
पोहवा तुळशीराम लोखंडे, पोना हनुमंत कोळेकर, पोलीस अंमलदार शिवाजी राठोड यांनी केली आहे.